पाटावरून ताटावर

आजचे विषय दोन आहेत आणि दोन्हीही भिन्न आहेत.


हल्ली पाटाचा वापर फक्त पूजेच्या वेळीच केला जातो. अनेक घरात पाटच नसतो. त्यात गैर काही नाही. कारण आता 'डायनिंग टेबल' संस्कृतीचा स्वीकार झाला आहे.

पूर्वी मात्र जेवायला पाटावरच बसत. जर पाट नसेल तर सतरंजी, छोटे जाजम किंवा चौरस आकाराची चटई याचा वापर केला जाई. असे का याचं कारण शोधताना मला असे दिसून आले, की टेबलावर जेवण जेवत असताना ताट छातीजवळ असते, त्यामुळे अन्नाचा घास घेताना थोडीशी मान पुढे झुकवावी लागते. याउलट पाटावर बसून जेवताना वाकण्याची प्रक्रिया जरा जास्तच होते. परत्वे, पोटावर दाब येतो, तो कमी होण्याची क्रिया नैसर्गिकपणे आपले शरीर करते. काय करते.. आपण पाठ ताट करतो, त्यामुळे पोटातील स्नायूंचे चलन वलन वाढते व घास अन्ननलिकेतून मार्गक्रमण करण्याची प्रक्रिया सुलभ होते.

तसेच चुकून घास सांडला तर ताटातच पडतो. अंगावर नाही.. मग गळ्याभोवतील रुमाल बांधावा लागत नाही, जी हल्लीची पद्धत आहे.

आता दुसऱ्या विषयाकडे वळूया. थोड्याच दिवसात श्रावण मास सुरू होईल. हा महिना पवित्र मास आहे असे गृहीत धरून दर दिवशी या महिन्यात तेहतीस कोटी देवातील निवडक देव-देवतांची विशिष्ट पूजाअर्चा केली जाते. मग उपवास आलाच. 

उपवास या शब्दाची फोड केली असता असे जाणवते 'उप' म्हणजे जवळ व 'वास' म्हणजे राहणे. थोडक्यात ज्या दिवशी आपण देवाजवळ जास्त वेळ राहतो तो दिवस. उपवासाचे दिवशी आपण पूजेत, मंत्र पठणात व तत्सम पोथ्यांच्या पारायणात मग्न असतो, त्यामुळे देवाच्या सानिध्यात अधिक काळ व्यतीत करतो. त्यामुळे आपल्या दिनचर्येत बदल होतो आणि परिपाक म्हणजे रोजचे अन्नभक्षण वेळेवर होत नाही. याला प्रचलित भाषेत 'उपवास' ज्याचा अपभ्रंश होऊन 'उपास' म्हणजे लंघन असे स्वरूप आले.

सर्वांना असे अन्न वर्ज करणे, भले तो एक दिवस का होईना हे जमत नाही. मग ते जमेल तसे पण कमी व वेगळे खाणे पसंत करतात. श्रावण मासात निसर्गचक्र असे असते की ज्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. या कारणास्तव हलकेफुलके पचायला सोपे असा आहार करणे आपण पसंत करतो.. तरीही, मंडळी उपासाचे दिवशी साबुदाण्याची खिचडी, खसखस खारकेचा शिरा, वरीच्या पुऱ्या, बटाटा-शेंगदाण्याची भाजी, बटाटा-राजगिरा थालीपीठ इत्यादी खाण्याआधी जरूर विचार करा. नाहीतर देवाची भक्ती आणि त्यामागे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपास असे समीकरण होईल. "Change in diet thy second name is upas".

पटलं तर ठीक नाहीतर या कानाचे ऐका व त्या कानाने सोडून द्या.

एक नम्र विनंती. Blog वाचून झाल्यावर आपली प्रतिक्रिया blog च्या खाली comments मध्ये आपल्या नावासहित द्या. त्यामुळे एकसंघ वाचन सोपे होते व इतरानासुद्धा share करता येते.

Comments

  1. सुंदर माहिती. आपल्या पूर्वजांच्या प्रत्येक कृतीला काही तरी वैज्ञानिक कारण आहे

    ReplyDelete
  2. Nice 👍 sanjeev Roy

    ReplyDelete
  3. Navinchandra Dighe1 August 2026 at 21:41

    अगदी पटण्यासारखं आहे

    ReplyDelete
  4. दत्तात्रय फणसे सुंदर माहिती

    ReplyDelete
  5. खुप छान,पाटावर बसून जेवणाचे महत्व आजोबांनी लहानपणी सांगितले होते,पण आम्ही मात्र ते चांगले शिकलेले अंमलात न आणता राजरोसपणे गेली कित्येक वर्षे टेबल खुर्ची वरच बसून जेवतो...
    उपवन,उप म्हणजे जवळच उद्यन,वास म्हणजे आपण सतत सानिध्यात राहून नामस्मरण करावे,हे पण शिकवलं होतं,पण सोईस्कर रीत्या उपवासाचे पदार्थ खाऊन झोप काढतो...
    धन्यवाद ,परत एकदा आठवण करून दिलीस....
    जागृती कणेकर.

    ReplyDelete

Post a Comment