माझ्या वाचक गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्य विनम्र अभिवादन. येत्या बुधवारी दिनांक २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा मंगलदिन आहे. सर्वत्र गुरुलहरी म्हणजेच दत्तलहरींचा प्रभाव जाणवतो.
या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. या दिवशी महर्षी व्यासांनी पृथ्वीवर पुनर्जन्म घेतला, अशी हिंदू धर्मात व संन्यासी जगतात धारणा आहे.
याचा संदर्भ धरता, या दिनी संन्यस्त मंडळी व्यासपूजेचे आयोजन करीत असावेत. आता कलियुगात मात्र शिष्य, गुरुची पूजा करतो असे दिसते. लौकिक अर्थाने नाही असे मी मानतो.
गुरु या शब्दाची फोड करता असे लक्षात येते की गु: म्हणजे अंधकार तर रु म्हणजे नाहीसा करणारा. थोडक्यात "अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून ज्ञानरूपी प्रकाश प्रदान करणारा व योग्य मार्गावर जो आणतो तोच गुरु".
ज्याला तुम्ही गुरुस्थानी मानता तो किंवा ती असे मार्गदर्शन देतात का? याचे परीक्षण करावयास काही हरकत नाही.
मी राजकारणातील गुरु-शिष्य या जोडीचा इथे विचारच करत नाही, हे ध्यानी असू द्या.
गुरु म्हणजे GURU थोडक्यात जी यु आर यु म्हणजेच आपल्यासारखे आपणच. गुरुसाठी हे किती चपखल बसते हे आपल्यास पटेल.
आद्य गुरुस्थानी श्री दत्त महाराज आहेत, हे त्रिकालाबाधित सत्य सर्वमान्य आहे.
व्यास या नावाचा भूमितीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करूया.
वर्तुळातील व्यास ही सर्वात मोठी जीवा (chord) असते. म्हणून कदाचित सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून व्यास महर्षी व वर्तुळ म्हणजे विश्व व्यापणारी आपली गुरुमाऊली. व्यवहारात जोवर आपले गणित ठीकठाक नसते, तोवर यश हुलकावणी देत असते. मी गणिताचा विद्यार्थी व शिक्षक अशा दुहेरी भूमिकेतून आयुष्याची वाटचाल करीत आलो आहे, हे तुम्हास वेगळे सांगणे न लगे. तरी कृपया गैरसमज करून घेऊ नका.
आपल्यातील सत्कर्मे जसजशी वाढत जातात, तसतसे आपल्यातील अंगीभूत गुरुतत्त्वाची जाणीव आपल्याला होऊ लागते. अर्थात गुरु शोधावा लागत नाही, तो आपल्या जवळच असतो. असे असेल तर गुरु करण्याची आवश्यकताच नाही. तरीही सत्कर्म करण्याचे मार्गदर्शन होण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक म्हणजेच गुरु असावाच........ मग तो जन्मदाते माता-पिता, बंधू-भगिनी, सखा, विद्यादान देणारे शिक्षक अथवा कार्यालयातील आपले सहकारी. ह्यातील जी मंडळी निरलस वृत्तीने आपल्या पाठीशी सदैव सावलीसारखे उभे असतात, हेच स्मरून त्यांचा यथोचित आदर सदैव असावा. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मग गुरुपौर्णिमेशिवाय इतर दुसरा कुठला शुभ दिवस असू शकतो?
पूर्वसंचित व या जन्मी आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या कृतींचे काही प्रमाणात फलित या जन्मीच भोगावे लागते. अशावेळी गुरु आपल्याला भरकटू देत नाही. जर भोग भोगावयाचे असतील, तर त्याची तीव्रता सहन करण्याची ताकद गुरुबळामुळे प्राप्त होते. आपला त्रास सुसह्य होतो.
गुरु हेअसे वलय आहे की जे अखंड आहे म्हणूनच गुरुआज्ञेचे पालन हीच खरी गुरुदक्षिणा.
'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥'
एक नम्र विनंती. Blog वाचून झाल्यावर आपली प्रतिक्रिया blog च्या खाली comments मध्ये आपल्या नावासहित द्या. त्यामुळे एकसंघ वाचन सोपे होते व इतरानासुद्धा share करता येते.

दत्तात्रय फणसे 🙏🙏
ReplyDelete